Thursday, December 31, 2009

टाटा २००९...

जवळ जवळ सगळ्या ब्लॉग्सवर २००९ ला निरोप आणि नववर्षाच्या शुभेच्छांचा सुळसुळाट झालाय. मी ठरवलंही होतं की आपण असं काही लिहायचं नाही , परंतू आताच अपर्णाचा ब्लॉग वाचला आणि मागे पडलेलं एक संपूर्ण वर्ष डोळ्यासमोरून गेलं. २००९ ने खूप खूप आनंदी क्षण दिलेत तर काही मोजकेच दु:खाचे क्षणही दिलेत... गोळाबेरीज करता २००९ खूप लकी ठरलं म्हणायला हरकत नाही.

तसं पाहीलं तर २००९ उजाडलं तेच एक प्रकारचं प्रेशर घेऊन. अमेरिकेत आलेली मंदीची लाट कित्येकांना त्यांची नोकरी राहील की नाही ह्या प्रश्नाने भेडसावत होती. खरंतर मला खूप भिती वाटायचं काही कारण नव्हतं. पण ह्यावेळी कंपनीज् समोर कंपनीत तुम्ही किती चांगलं काम करता ह्यापेक्षा कंपनी खरंच तुम्हाला (आणि कंपनीतल्या तुमच्या सारख्या अनेकांना) अफोर्ड करू शकते का हा प्रश्न होता. त्यामुळे अश्या काळजी वाहणार्‍या कित्येकात मी पण होतो. पण म्हणतात ना 'तो' वर बसलेला सगळं बघतो, त्याला माहीत असतं प्रत्येकाला काय, किती, आणि कधी द्यायचंय ते. मग 'फिकर कायको करने का?' असं म्हणून, त्याच्यावर सगळं सोपवून मोकळा झालो, आणि २००९ अगदी मजेत गेलं.

मला माझ्या जवळच्या मित्रांना भेटायला, त्यांच्याबरोबर हुंदडायला खूप आवडतं. म्हणूनच चान्स मिळेल तेव्हा मी त्यांना भेटायला जातो. २००९ मधे हे मैत्र्यसुख खूप अनुभवलं. मित्रांबरोबरचा वॅलन्टाईन्स डे, दुसर्‍या एका जवळच्या मित्राचा बर्थडे, काही मित्रांचे ग्रॅज्युएशन सेरेमोनी, स्मोकी माऊंटनस् ची १२ मित्र मैत्रिणींनी मिळून केलेली अ‍ॅडव्हंचरस आणि अविस्मरणिय ट्रिप, न्यु ओरलेन्सला मित्राकडे मस्तंपैकी आरास करून बसवलेला गणपती, त्याच मित्राने मागच्या महिन्यात घर घेतलं तेव्हा मुव्हींग करताना केलेली धावपळ... सगळं सगळं आनंद देणारं होतं. तसेच ऑफिसातली लोकसंख्या यावर्षी कमी झाल्याने वर्क लोडही जास्तं होतं, पण प्रेशर मधे काम करण्यातही खूप मजा आली.

वरच्या सगळ्या गोष्टींवर कोटी म्हणजे, दिवाळीत केलेली भारतवारी! तब्बल ७ वर्षानंतर मी दिवाळीत घरी होतो. अभ्यंग स्नानापासून ते औक्षण, फराळ, भाऊबीज सगळं अगदी मस्तं एंजॉय केलं. जवळ जवळ दोन वर्षाने आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो. आईची बोटं केसांमधून फिरली आणि वाटलं 'सुख याहून काय वेगळं असतं का?' भारतातले तिन आठवडे खूप लवकर संपले. काय नाही केलं या तिन आठवड्यात. दिवाळी झाली, नागपूरमधे मी आणि दादाने मिळून घर घेतलं. आणि अजून एक महत्वाची गोष्टं म्हणजे या सगळ्या धावपळीत माझी 'विकेट पडली'.

एक सांगायचं तर राहूनच गेलं... मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी इथे लिहायला सुरवात केली. खरंतर वर्षभरात खूप काही लिहिलं नाही, आणि खूप कोणाला मी लिहतोयं ते सांगीतलंही नाही (वेल, इथं जे लिहित होतो ते मिसळपाववर पण टाकत होतो). असं असताना सुद्धा मागच्या काही पोस्ट्सवर काहीजणांनी चांगले कॉमेंट्स दिले आणि आता लिहिण्याचा अजून हुरूप आलायं (थँक्स अपर्णा, कांचन, महेंद्रकाका, अजय आणि इतर). २००९ खरोखर छान गेलं, त्याला टाटा म्हणवत नाहीये. पण ते थांबणार थोडंच आहे. २००९ तु माझ्यासाठी खूप लकी होतास, म्हणून इच्छा नसतानाही २००९ तुला निरोप देतोय. २०१० सुद्धा तुझ्यासारखंच असेल अशी अपेक्षा करतोय!

तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा! हे नवे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ...

-अनामिक

Wednesday, December 23, 2009

टॅग अलाँग...

पहिलेच सांगतो की मला कुणीच टॅग केलेलं नाही. वेल, तसंही म्हणता येणार नाही कारण 'सहजच'ने लिहून ठेवलंय की जे जे राहीलेत त्यांना ती टॅग करतेय. खरं सांगू का? हा टॅगा टॅगीचा खेळ पाहिला आणि मन भूतकाळात गेलं... कॉलेज संपताना मित्र-मैत्रिणींचे भरलेले स्लॅमबुकं आणि डायर्‍या आठवल्या... आणि परत तो खेळ खेळ खेळावासा वाटला... म्हणून कोणी टॅगलेलं नसतानाही, माझी या खेळात थोडी भर.

1.Where is your cell phone?
इथंच, पडलाय निवांत माझ्या बाजूला. कालच याच्याबद्दल पोस्ट टाकलं म्हणून स्वारी खुश आहे!

2.Your hair?
थोडे थोडे पांढरे व्हायला लागलेत. मागे कुणीतरी म्हणालं होतं की हुशार लोकांचे केस लवकर पांढरे होतात म्हणून... तसं असतं तर माझे केस याआधीच आणि आहेत त्याहून जास्त पांढरे व्हायला हवे होते.

3.Your mother?
खूप साधी, खूप प्रेमळ...

4.Your father?
थोडे तापट वाटतात, पण हळवे आणि प्रेमळ

5.Your favorite फूड
सध्या तरी स्वतः करून खात असल्याने, जे काही आयतं मिळेल ते...

6.Your dream last night?
स्वप्नं क्वचितच पडतात.... कधी कधी कलर तर कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट स्वप्नं! आहे की नाही गम्मत?

7.Your favorite drink?
आलं वेलची घातलेला चहा.

8.Your dream/goal?
ओह माय गॉड, इट्स हर...

9.What room are you in?
बेडरूम

10.Your hobby?
मित्रांबरोबर भटकायला जाणे... गप्पा मारणे, मुव्हीज बघणे

11.Your fear?
काकाकडे उन्हाळ्यात सुट्टीसाठी जायचो त्यावेळी रात्री गच्चीवर झोपायचो सगळे.... अंगणातल्या नारळाच्या झाडावरच्या 'ठक-ठक'ची (रा़क्षस, भूत, काय का असेना) अजूनही भिती वाटते.

12.Where do you want to be in 6 years?
भारतात.

13.Where were you last night?
फिजीकली इथंच बेडरूम मधे, पण मन मात्र कुठंतरी भटकायला गेलं होतं.

14.Something that you aren’t?
फेक. म्हणजे तोंडावर एक आणि पाठ फिरली की एक असं नाही माझं.

15.Muffins?
हो तर... बनाना नट मफीन आवडतं मला.

16.Wish list item?
कॅनन किंवा निकॉनचा एस.एल्.आर कॅमेरा... सध्यातरी एवढंच.

17.Where did you grow up?
उमरखेड... विदर्भात आहे.

18.Last thing you did?
किचनचा ओटा साफ केला.

19.What are you wearing?
पायजामा आणि टी.

20.Your TV?
गराज सेलमधून उचललेला आहे.

21.Your pets?
नोप. घरी अजीबात नको.

22.Friends
भरपूर आहेत, मात्र अगदी जवळचे खूप थोडे.

23.Your life?
चाललंय निवांत!

24.Your mood?
फ्रेश

25.Missing someone?
हो तर... घरच्या सगळ्यांना मिस करतोय.

26.Vehicle?
होन्डा अ‍ॅकॉर्ड.

27.Something you’re wearing?
अरमानी कलोन.

28.Your favorite store?
एवढ्यात स्टार-बक्स.

Your favorite color?
ब्लॅक

29.When was the last time you laughed?
आताही हसतोय... एकेकाचा चेहराच असतो हसरा.

30.Last time you cried?
भारतातून इथं परत येताना... अगदी थोडंसं!

31.Your best friend?
खूप कमी आहेत, आणि जे आहेत त्यांना ते माहीत आहे.

32.One place that you go to over and over?
ऑफीस?

33.One person who emails me regularly?
रेगुलरली मेल करायला कोणाला वेळ आहे?

34.Favorite place to eat?
आयतं करून खाऊ घालणारा/री जिथे बोलवील ती जागा.
________

मी माझी पोस्ट जो कोणी वाचेल त्याला टॅग करतो. Let's tag along...

-अनामिक

Tuesday, December 22, 2009

मी आणि माझा फोन

अबे अभितक तु यही फोन युज कर रहा है, अब तो बदल ले... - एक मित्र

जरूरत क्या है? - मी

आज कल तो कितने सही सही मॉडेल्स मिलते है... कबतक वही डिब्बा युज करेगा... - एक मैत्रिण

वो सब ठिक है, पर मेरे लिये यही ठिक है. और ऑफिसका सेलभी है मेरे पास. - परत मी

पर वो भी तो डिब्बाही है.. तु आय फोन, या एल जी व्ह्यु क्यों नही लेता... या फिर ब्लॅकबेरी तो ले ही ले... - दुसरा मित्र

कितनी कंजुसी करेगा... नही तो हम सब काँट्री करके तुझे सेलफोन गिफ्ट करते है... - मित्रांपैकीच कुणीतरी

अरे लेकीन फोन किसलिये होता है? बात करनेके लिये ना? मेरा डिब्बा वो काम कर लेता है... मुझे नये फोन की जरूरत नही लगती.... और मेरा इसके साथ एक अटॅचमेंटसा हो गया है... - मी परत समजवायचा प्रयत्न करतो.

प्रत्येक दोन-तीन भेटीनंतर माझा सेलफोन हा आमच्या ग्रुपमधे (ज्यात मी सोडून अजून एकच मराठी आहे) हसण्याचा किंवा चर्चेचा विषय ठरलेला असतो. खरंतर सध्या बाजारात येणार्‍या नवीन सेलफोन्स आणि त्यात असलेल्या सुविधा बघता कदाचित माझे मित्र योग्यच सांगत असतील. पण खरोखर मला नव्या फोनची गरज वाटतच नाही. शिवाय माझी माझ्या फोनशी खरंच एक अटॅचमेंट झालीये, ज्यामुळे हा फोन टाकून नव्या फोनला खिशात (पक्षी आयुष्यात) जागा द्यायची इच्छाच होत नाही. आणि फोनचं मुख्य काय काम असतं हो? हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी बोलण्याचं माध्यम बनणे... बरोबर? माझा फोन हे काम अगदी चोखपणे बजावतो, मग त्याला बदलण्याची गरजच काय?

तसं पाहायला गेलं तर माझा सध्याचा फोन हा माझ्या आयुष्यातला दुसरा फोन. इथे अमेरिकेत आल्यावर जवळ जवळ ६-८ महिन्यांनी माझ्या पहिल्या फोनने, मोटोरोला व्ही-३००ने, माझ्या आयुष्यात प्रवेश केला. तळहातावर मावणार्‍या, अगदी पिटुकल्या, निळ्या रंगाच्या, फ्लॅप असलेल्या ह्या फोनने माझ्यावर तेव्हा चांगलीच भुरळ पाडली होती. पण नव्याचे नऊ दिवस प्रमाणे फोनच्या काँट्रॅक्टचे वर्ष संपता संपता ह्या फोनने त्रास द्यायला सुरवात केली. काँट्रॅक्टमधे असल्याने हा फोन मोबाईलसेवा देणार्‍या कंपनीकडून बदलूनही घेतला, पण त्यानेही ४ महिन्यातच आपली मान टाकली... आणि मला ह्या फोनचा तिथेच निरोप घ्यावा लागला. आता मला नवीन काँट्रॅ़क्ट करून नवीन फोन घेणे भाग होते, पण तो घेईस्तोवर काय? असा प्रश्न पडला. तेव्हा एका सीनियर मित्राने त्याचा स्पेयर फोन, सोनी-एरिकसन, मला वापरायला दिला. ते साल असेल २००५. मित्रांनो, हाच सोनी-एरिकसन, माझ्या आयुष्यातला दुसरा फोन, चार वर्षानंतर अजूनही माझ्या बरोबर आहे.

माझी ही 'सोनी' (म्हणजे माझा फोन) खूप खूप गुणी आहे. एवढ्या दिवसांपासून माझ्याजवळ असूनही कध्धी हिने मला त्रास दिला नाही. आजही हिच्याशी दररोज २-३ तास बोलूनही २-२ दिवस चार्ज करायला लागत नाही. कधीही कॉल ड्रॉप झाले नाहीत की कधी हिच्या (अंतर्गत) एंटीनाने रेंज धरसोड केली नाही. नाही म्हणायला हिच्या मागून आलेल्या आणि तिखट झालेल्या फोनने अनेकदा भुरळ पाडली... कधी कधी हिला सोडून दुसरीला जवळ करावेसेही वाटले. पण प्रत्य़क्ष्यात असं काही करू नाही शकलो. त्यामागे कारणही तसेच आहेत. दोन वर्षांपुर्वी रोलरकोस्टर राईडवरून खाली पडून ही हरवली... ज्याच्याकडे गेली त्याने हिला लॉस्ट अँड फाऊंड मधे जमा केली. तेथील लोकांनी ही माझीच आहे याची खात्री करून एका आठवड्याने सुखरूप माझ्याकडे पाठवली. त्यावेळी तिला सुखरूप बघून खूप आनंद झालेला. ह्या प्रसंगानंतर मी खूप काळजी घ्यायचा प्रयत्न केला. पण ही परत दोन वेळा हरवली आणि दोन्हीवेळा सुखरूप माझ्याकडे आली. हिच्यावर असलेली फ्रेंन्डस् ची रिंगटोन, म्हणजे "आय विल बी देअर फॉर यू" हे ती नुसती म्हणतच नाही तर त्या शब्दांना पाळते सुद्धा!

आज कितीतरी वेगवेगळ्या सुविधा असलेले फोनस् उपलब्ध आहेत. इंटरनेट, ऑनलाईन टिवी, जी.पी.एस सगळं सगळं ह्या फोनस् मधे उपलब्ध आहे. पण एवढं सगळं असून खरंच या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे का हे तपासून बघणे गरजेचे आहे. मी आधीच म्हंटल्याप्रमाणे मला तरी ह्या गोष्टी अनावश्यक वाटतात. शिवाय माझी माझ्या सोनीशी एक अटॅचमेंट आहे. छोटंस यंत्र असलं म्हणून काय झालं, हिला सोडायला जीव होत नाही. हिच्याकडे बघता कदाचित हिच मला लवकरच सोडून जाईल असे वाटते, पण तोपर्यंत माझ्या सोनीला मी सुद्धा "आय विल बी देअर फॉर यू" असेच म्हणेन...

ये रही मेरी 'सोनी'.....


अवांतरः फोनला हासू नये!

-अनामिक
(हा लेख मी याआधी मिसळपाववर पोस्टवला होता.)

Thursday, December 17, 2009

होतं असं कधी कधी...

मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका. होतं असं कधी कधी!

_____________

मी नुकताच शाळेत (बालकवाडीत) जायला लागलो होतो. म्हणजे चार्-आठ दिवसच झाले असतील. एक दिवस घरचा नोकर मला सायकलवर शाळेत सोडत होता, तेवढ्यात घरापासून जवळच राहणार्‍या एका डॉक्टर काकांना आम्ही दिसलो. ते त्यांच्या मुलीला मोटरसायकलवर शाळेत सोडत होते. खरंतर तिची आणि माझी शाळा शेजारी शेजारी होती. पण त्या काकांना वाटले की आम्ही दोघे एकाच शाळेत (वर्गात) आहोत. तरी बरं मी माझी शाळा पास होताना मी त्यांना म्हंटलंही 'काका माझी शाळा, काका माझी शाळा'. पण त्यांना वाटलं मी समोर दिसणार्‍या शाळेबद्दल बोलतोंय, ते पण म्हणाले... 'हो बेटा, तुझी शाळा'... आणि मला त्या नवीन शाळेत सोडलं. मला काय, लहान होतो त्यामुळे नवीन शाळेत गेलो. सकाळीच नोकराला त्या काकांनी सांगितले होते, की काही काळजी करू नको मी या दोघांना दररोज सोडत जाईन आणि न्यायला पण येत जाईन. त्यामुळे पुढचे चार्-पाच दिवस मी काकांच्या कृपेने नवीन शाळेत जात होतो. त्या नवीन शाळेतल्या बाईंना शेवटी कळालंच की मी त्यांच्या शाळेत नाव न नोंदवताच जात आहे. त्यांनी चौकशी केली मी कुणाचा आहे याची आणि म्हणाल्या की उद्या बाबांना शाळेत घेऊन ये. मी घरी येतो तर घरी माझ्या खर्‍या शाळेतून निरोप आलेला होता की मी शाळेत येतच नाहीये आणि मी सांगत होतो की उद्या शाळेत बोलावलंय. घरचे गोंधळात! शेवटी रात्री डॉ. काकांना विचारल्यावर उलगडा झाला की मी दुसर्‍याच शाळेत जात आहे म्हणून!

_____________

अजून एक अशीच ऐकलेली गोष्टं. ताई चार एक वर्षाची असेल (मी तेव्हा जन्मलोही नव्हतो). आई-बाबा तेव्हा साकळेंच्या वाड्यात भाड्याने रहायचे. शेजारी बरीच बिर्‍हाडं होती, त्यामुळे ताई नेहमीच कुणाकडेतरी खेळायला जायची. प्रत्येकवेळी विचारल्याशिवाय आई कुणालाच ताईला घेऊन जाऊ देत नसे. पण एक दिवस कुणी घेऊन गेलं नाही तरी ताई घरातून गायब झाली. आईला सुरवातीला वाटलं बाजूच्याच घरी असेल, पण मग विचारलं तर ति तिथे नव्हतीच. मग शेजारी पाजारी सगळीकडे विचारून झालं. कुणाकडेच नव्हती ताई. मग मामाकडे पाठवलं एकाला की तिथे नेलंय का कोणी म्हणून विचारयला, पण तिथेही नव्हती ताई. एक आजोबा नेहमी ताईला ते स्वतः फेरफटका मारायला जाताना घेऊन जायचे. त्यांनाही विचारून झालं. पण ताईचा कुठेच पत्ता नव्हता. आता आई चांगलीच घाबरली. बाबांना दुकानत निरोप गेला. बाबा तातडीने घरी आले. परत सगळ्यांची शोधाशोध सुरू. दोन एक तासानंतर पोलीसात जायचा निर्णय घेत होते, त्याच वेळी आजोबांना खोलीतल्या कोपर्‍यात ठेवलेल्या सुटकेसमधे काहीतरी हालचाल जाणवली. आजोबा आईला म्हणाले चेक कर, उंदीर असेल. आईने सुटकेस उघडली तर ताईसाहेब आत घामाघूम, पण निवांत झोपलेल्या आढळल्या. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

______________

आमच्या शाळेत पोटे सर म्हणून मुख्याध्यापक होते. आणि पोटे बाई म्हणजे त्याच्या पत्नीसुद्धा शाळेतच शि़क्षिका होत्या. अर्थातच ते दोघे सरांच्या गाडीवर सोबतच शाळेत यायचे. एक दिवस शाळेत येताना चौकात ते कशासाठीतरी थांबले असावे. कामा संपल्यावर पोटेसरांनी गाडी सुरू केली, बाईंना बसायला सांगितलं. बाई बसता असतानाच त्यांनी गाडी चालवायला सुरवात केली... बाई जागेवरच पडल्या, पण सर आपल्याच तंद्रीत पुढे निघून गेले. इकडे बाई 'अहो मी पडले, अहो मी पडले' म्हणून ओरडत होत्या. सरांना मात्र बाई गाडीवर नाहीत हे शाळेत गेल्यावर कळालं. बाई कुठे गेल्या हे बघण्यासाठी ते तसेच परतले तर बाई सायकल-रिक्षातून शाळेत येत होत्या. हा किस्सा गावात येवढा फेमस झाला की शाळेतली काही कार्टी बाई किंवा सर रस्त्यात कुठे दिसले की लपून बसत आणि 'अहो मी पडले, अहो मी पडले' असे त्यांना चिडवत.

_____________

मी आठवी नववीत असेल. मराठीचा तास सुरु होता. बाई धडा वाचत होत्या. त्यात कोण्यातरी गरीब मुलांची कहाणी होती, आणि त्यांना कशी फक्तं कधीकाळी पुरणपोळी खायला मिळायची त्याबद्दल लिहिलेलं होतं. मी आपल्याच तंद्रीत होतो बहुतेक. मी ते चुकून 'कधी कधी काळी पुरणपोळी खायला मिळायची' असं वाचलं. परिच्छेद वाचून झाल्यावर माझा हात वर बघून बाईं 'काय?' म्हणाल्या तसं मी काळी पुरणपोळी कशी असते असं विचारलं आणि त्यानंतर वर्गात एकच हशा पिकला. लक्ष न दिल्याने मला फारचं लाजल्या सारखं झालं. मी हि गोष्टं विसरूनपण गेलो. बाईपण 'मी' असं विचारलं होतं हे विसरून गेल्या असाव्यात. त्यानंतर काही दिवसांनी बाई आणि माझी आई कुठल्यातरी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून होत्या. त्या दोघींची चांगली मैत्री असल्याने बाईंनी बोलण्याच्या ओघात मुलं कसा गोंधळ घालतात आणि वाचताना शब्दांची कशी चिरफाड करतात ते 'काळ्या पुरणपोळी'च्या उदाहरणासकट सांगितलं (पण त्यांनी मीच तो घोळ घालणारा असं सांगितलं नाही). काही दिवसांनी घरी काहीतरी होतं म्हणून मामाकडचे सगळे आणि काही जवळचे लोक जमले होते. जेवणे आटोपल्यावर सगळेजण हॉलमधे गप्पा मारत होतो तेव्हा आईने मुलं कशी वेंधळी असतात ते सांगताना बाईंनी सांगितलेलं उदाहरण सगळ्यांना सांगितलं आणि वरून 'अशी कशी बाई आजकालची मुलं, नीट वाचतही नाहीत' असा शेरा मारला. मी हळूच म्हणालो 'आई तो मुलगा मीच', तेव्हा आईने कपाळावर हात मारून घेतला.

_______________

इंजिनियरींग कॉलेजात असताना कॉलेजच्या आवारातच कॉलेजच्या प्रिन्सिपॉलला राहण्यासाठी एक बंगला होता. एका प्रोफेसरांनी एक दिवस शेवटचं लेक्चर जरा जास्तंच लांबवलं. संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही मित्रमैत्रीणी गप्पामारत कॉलेजच्या बसस्टॉपकडे जात होतो. जाताजाता त्या प्रिन्सिपॉलच्या बंगल्या बाहेर एक माणूस पायजामा, बनियन घालून गवत साफ करत होता. तेवढ्यात एक मैत्रिण म्हणाली...'इस आदमी को पेहले भी कंही देखा है'... आम्ही सगळे त्याच्याकडे बघायला लागलो आणि सगळ्यांनाच वाटलं की खरच या माणसाला आपण पहिले कुठेतरी पाहिलं आहे. तेवढ्यात एका मित्राच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि तो म्हणाला 'अबे ये तो अपने प्रिन्सि है'... आणि सगळेच हसायला लागलो. नेहमी अगदी कडक इस्त्रीच्या कपड्यात राहणार्‍या प्रिन्सिला पायजामा, बनियनमधे बघून असं झालं होतं. होतं असं कधी कधी.

_______________

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मी भारतातून परत इथं आल्यापासून अगदी वेधंळ्यागत वागतोय. आपल्याच तंद्रीत असतो एवढ्यात. मागच्या एका महिण्यातल्याच गोष्टी. एक दिवस सकाळी ऑफिससाठी ट्रेनमधे बसलो तर ऑफिसच्या स्टेशन नंतर दोन स्टेशन गेल्यावर लक्षात आलं. बर परत येताना तरी नीट उतरावं की नाही... पण नाही, परततानापण मी ऑफिसच्या नंतरच्या स्टेशनवर उतरलो. ऑफिसला पोचायला फारच उशीर झाला त्या दिवशी! एक दिवस घरी परतल्यावर सूप बनवलं... अर्धं बाऊलमधे घेतलं आणि परत भांड गॅसवर ठेऊन बेडरूमधे येऊन बसलो. कितीतरी वेळाने किचनमधे गेलो तेव्हा लक्षात आलं की गॅस बंद केलाच नव्हता. त्या सूपचं पिठलं झालं होत आणि भांड खालून जळालं होतं. मागच्याच आठवड्यातली गोष्टं, कॉफी गरम करायला मायक्रोवेव्ह ऐवजी फ्रिजमधे ठेवली आणि टायमर साठी बटण दाबायला गेलो तेव्हा लक्षात आलं! आणि परवाच सकाळी ऑफिसला निघताना लावलेला टिव्ही ऑफिसमधून घरी गेल्यावर बंद केला. म्हणायला छोट्या छोट्या गोष्टी, पण हल्ली जरा जास्तंत होतंय. कधी अनावधानाने, कधी आपल्याच तंद्रीत असल्याने, तर कधी वेंधळेपणाने असं होत असावं... तुमच्या सोबतही होतं का असं कधी कधी?

-अनामिक

Thursday, August 20, 2009

आठवणीतला पोळा

फोटो जालावरून साभार


आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्‍याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो. बैलांचे हे उपकार ह्या एका दिवसाच्या पुजेने थोडेच फिटणार आहेत? तरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रकार मला अगदी भावतो. प्रत्येक शेतकरी सच्च्या दिलाने हा सण साजरा करतो. लहानपणापासूनच मला या सणाचं विशेष आकर्षण वाटत आलं आहे. माझ्या पोळ्याबद्दलच्या आठवणीही तशाच आहेत.

आमच्या घरी आजोबांची बर्‍यापैकी शेती होती(/आहे). पण पोळ्याचा सण हा आम्ही सध्या जिथे राहतो त्याच गावी, म्हणजे उमरखेडमधेच (विदर्भात आहे) साजरा करत असू. खरंतर उमरखेड हे माझं आजोळ म्हणायला हवं. माझे बाबा इथे व्यवसायाकरता आले. मामाची उमरखेड मधेच शेती आहे, शेतात दोन बैलजोड्याही आहेत. त्यामुळे शिकण्यासाठी गावाबाहेर पडेपर्यंत पोळा अगदी उत्साहात साजरा केलाय. सगळ्या शेतकर्‍यांची जशी होते तशीच मामाकडेही पोळ्याची तयारी दोन-चार दिवस आधीपासूनच सुरु व्हायची. मागल्या वर्षी कुठेतरी घड्या करून ठेवलेले झूल संदुका, कपाटातून बाहेर यायचे आणि नीट झटकून बाहेर अंगणात उन खायला ठेवलेले असायचे. सोबतच बाशींगे, गोंडे, तुरे, इ. सामानही कपाटतून बाहेर यायचं. सगळं सामान व्यवस्थीत वापरण्याजोगं आहे की नाही याची खातरजमा व्हायची. बैलांची शिंगे रंगवायला ऑईलपेंटचा डबा, ब्रश, आणि बेगडही खरेदी करून झालेलं असायचं. मी ही सगळी तयारी स्वतः कधीच केली नाही, पण पोळ्याच्या एक दिवस आधी मामाकडे गेलं की सगळं तयार दिसायचं.

आमच्या भागात पोळ्याचा अधीच्या दिवसाला खांदमळनाचा दिवस म्हणतात. ह्या दिवशी सायंकाळी शेतातला गडी घरी बैल घेऊन यायचा. त्यांची पुजा करण्याआधी बैलांच्या खांद्यावर भिजवलेली हळद लावली जायची. मला हा प्रकार म्हणजे नवर्‍या मुला/मुलीला लग्नाच्यावेळी हळद लावण्याचा जो प्रकार आहे तसाच वाटायचा. हळद लावून झाली की बैलांची पाय धुवून पुजा आणि आरती केली जायची. त्यांच्या कानात दुसर्‍या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी घरी येऊन सण साजरा करण्याचं आमंत्रण दिलं जायचं. सगळ्यांची जेवणं झाली की गडी बैलांना घेऊन परत शेतात जायचा.

पोळ्याच्या दिवशी गावात सगळीकडेच फार गडबड असायची. घरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरणं लावली जायची. घराच्या प्रवेशदाराच्या दोन्ही बाजूला पळसाच्या फांद्या, ज्याला 'मेढी' म्हणतात, उभ्या केल्या जायच्या (ह्या मेढीचं काय महत्व ते माहीत नाही). खर्‍याखुर्‍या बैलांसोबतच घरी मातीच्या बैलांचीही पुजा होत असे. त्यासाठी एक लाकडी पाट चुना आणि गेरूने रंगवला जायचा. त्यावर बैलांची मांडनी करून मग मी आणि दादा पुजा करत असू. हा प्रकार संपवून मी मामाकडे पोचेपर्यंत बैलांची अंघोळ घालून झालेली असायची. त्यानंतर मी आणि मामेभाऊ मिळून त्यांच्या शिंगांना रंग देत असू. रंग देताना ब्रश बैलांच्या अंगाला कुठे लागू नये याची काळजी घ्यावी लागे. शिंगांवरचा रंग वाळत आला की त्यावर बेगड लावायची. दुपारी ४ च्या सुमारास बैलांना अजून सजवायला सुरवात व्हायची. बाशिंगे, तुरे बैलांच्या कपाळावर चढवली जायची. पाठीवर झूल आणि पायात घुंगरू बांधले जायचे. मस्तं सजवलेले बैल खूपच दिमाखदार दिसायचे.

तयार झालेले बैल घेवून मारुतीचे मंदीर असलेल्या चौकात, म्हणजे पोळा भरायच्या ठिकाणी घेऊन जायचो. मंदिराभोवती एक प्रदक्षणा घालून बैलांना घेउन एका निश्चित ठिकाणी उभे रहायचे. शेकडो-हजारो लोक आपापल्या बैलजोड्या घेऊन या चौकात जमा व्हायचे. आम्ही भावंडं कोणते बैल किती सजले आणि कोणते खूप छान दिसताहेत हे बघत फिरायचो. तासेक भर फिरून होईस्तोवर गावच्या मानलेल्या पाटलाचे बैल पोळ्याच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात, वाजत गाजत यायचे. ह्यांच्या मंदिराभोवती प्रदक्षणा मारून झाल्या की सगळी कडे 'पोळा फुटला' ही बातमी क्षणात पसरायची. सगळीकडे एकच गोंधळ.... आपापल्या बैलांना घरी घेऊन जाण्यासाठी. घरी परतताना आम्ही भरपुर फुगे आणि लाडीलप्पे (पाण्याचे फुगे) खरेदी करून नेत असू. घरी आलो की बैलाची परत एकवेळ पुजा आरती केली जायची. पुरणपोळीच्या जेवणाने पोळ्याचा दिवस संपायचा.

पोळ्याचा दिवस संपला तरी लोकांचा उत्साह कमी होत नसे. दुसर्‍या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघत असे. ह्या दिवसाला तन्हा पोळाही म्हणत. कारण ह्या दिवशी लहान मुले घरी पुजा केलेल्या मातीच्या बैलांना घरोघरी मिरवून आणत असत. कुणी ह्या मुलांना खाऊसाठी पैसे देत तर कुणी खरोखरचा खाऊ. कितीतरी खेडेगावात तर या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती लागतात म्हणे. असा पोळा साजरा करून आज बरीच वर्षे उलटलीत पण सगळं तस्संच्या तसं डोळ्यासमोर आहे. शहरी भागातल्या कितीतरी लोकांना पोळा भरणे, पोळा फुटणे हे प्रकार माहीतही नसतील. म्हणूनच माझ्या आठवणीतून आमच्या गावच्या पोळ्याची ओळख करून द्यायचा का खटाटोप.

पोळ्याच्या दिवशी सजवण्यात येणार्‍या बैलांवर लहान असताना आईने एक कविता शिकवली होती. मध्यंतरी ती विसरलो होतो, पण मग प्राजु ताईने ति कविता तिच्या यजमानांकडून मिळवून दिली होती... ति कवीता इथे देत आहे. ह्या कवितेसाठी
प्राजु ताई आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद!

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार

राजा परधान्या, रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे

दुल दुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे.

काहीवेळा झुलीच्या खाली असलेले वळ जरी खरे असले तरी बहुतांशी शेतकर्‍याचे त्याच्या बैलांवर खरोखर प्रेम असते. ते त्यांची खूप काळजी घेताना दिसतात. त्यामुळे ह्या कवितेचा शेवट मला तितका आवडत नाही.

-अनामिक

Sunday, August 16, 2009

क क क क कमीने

फ्पॉयलर अलर्टः या परिक्फणात कथा न फांगण्याचा खूप प्रयत्न केलाय. तरी वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावे.

आताच 'कमीने' बघून आलो. आता मी हा चित्रपट का पाहिला अफे विचारणार अफाल तर उत्तर आहे केवळ करमणूकीकरता आणि फनीवारचा वेळ चांगला जावा म्हणून. कालपरवाच्या पेपरात ह्या चित्रपटाला चार चांदण्या मिळालेल्या पाहिल्या आणि जायचं पक्कं केलं. तफा फमिक्फकांनी दिलेल्या चांदण्यांचा आजकाल माझ्यावर काही परिणाम होत नाही. केवळ एक चांदणी मिळालेला 'कंबख्त इफ्क' आणि तीन का चार चांदण्या मिळालेला 'लव्ह आज कल' हे दोन्ही चित्रपट भंगार (पहिला अतिफय आणि दुसरा जरा कमी) कॅटेगरीमधेच मोडतात... त्यामुळे कमीनेपासून 'करमनूक व्हावी' एवढीच माफक अपेक्फा होती. तफेच विफाल भारद्वाजचा चित्रपट अफल्याने चांगला अफणार अफेही वाटले होते. चित्रपट पाहण्याचं अजून एक कारण म्हणजे प्रियांका चोप्रा... ह्या पोरीवर आमचा फार जीव!, तिच्या चेहर्‍यावरचं एक हफू आणि तिने केलेला ओठांचा चंबू आम्हाला कुठं कुठं जाऊन भिडतो आणि मग अमंळ गुदगुल्या होतात. अफो, चित्रपट फंपल्यावर मात्र त्यावर खर्च झालेले पैफे वफूल झाल्याच फमाधान मी धरून बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर दिफलं.

चित्रपट चांगला आहे यात वादच नाही. चित्रपटाची कथा फांगत बफत नाही... थोडीफार कल्पना मात्र जरूर देतो. कथा एकमेकांपाफून दुर राहणार्‍या आणि पुर्वायुफ्यात झालेल्या एका प्रफंगावरून आपफात वितुफ्ट आलेल्या दोन जुळ्या भावांची आहे. गुड्डू आणि चार्ली (दोघेही फाहीद कपूर). त्यातला गुड्डू फरळमार्गी, कॉलेजात फिकणारा आणि फ्वीटीच्या (म्हणजे प्रियांका चोप्राच्या) प्रेमात पडून बराच पुढे गेलेला. तर चार्ली जरा गुंड प्रवृत्तीचा, घोड्यांच्या रेफचा बुकी व्हायचं फ्वप्न बघणारा, आणि फॉर्टकट वापरून पैफे कमवण्याचा मागे अफलेला. चित्रपटातील हे मुख्य दोन ओळखीचे चेहरे फोडले तर बाकी फगळे नवीन चेहरे आहेत. त्यातल्या त्यात अमोल गुप्ते, ज्यानी फ्वीटीच्या महाराफ्ट्राभिमानी गुंड भावाची ज्याला नेता व्हायचंय अफी भूमीका फाकारली आहे, हे नाव ऐकून होतो. अमोल गुप्ते हा एकच गुंड या चित्रपटात नाहीये. अजून दोघे भ्रफ्ट पोलीफ, आणि ड्रग्फ फ्मगल करणारी एक गँगही या चित्रपटात आहे. चार्लीला अचानक मिळालेल्या एका फॉर्टकट्मुळे आणि गुड्डूच्या नाईलाजाने एकमेकांपाफून दुर राहणारे दोघे भाऊ फंकटात फापडतात. त्यात जुळे अफल्याने वेगवेगळ्या गुंडाच्या ताब्यात (म्हणजे जो ज्या गुंडाच्या ताब्यात हवा नेमके त्याऊलट) येतात... पुढेही बरेच काही घडते ते चित्रपटातच पहा. फुरवातीला अगदी थोडावेळ फंथगती अफलेला हा चित्रपट पुढे खूप वेग घेतो तो फंपेपर्यंत थांबतच नाही. प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी होतो.

चित्रपटातल्या फगळ्याच कलाकारांच काम छान झालं आहे. फाहीद कपूरने दोन जुळे भाऊ किंबहुना दोन भिन्न व्यक्ती उत्तमरित्या फाकारल्या आहेत. प्रियांका चोप्राने मराठी मुलीची डिग्लॅमरफ भुमीका फाकरली आहे जी तिच्या पुर्वीच्या चित्रपटांपे़क्फा बरीच वेगळी आहे. तिच्या तोंडी अफलेले मराठी फंवाद ऐकायला चांगले वाटतात. अमोल गुप्तेनेही त्याच्या भुमीकेचं फोनं केलं आहे. चार्लीच्या मित्राची भुमीका फाकारणारा नवकलाकारही लक्फात राहतो. बाकीचे कलाकार नवीनच दिफले, म्हणूनच की काय त्या त्या भुमीकेत योग्य वाटतात. गुंडगीरीची पारफ्वभूमी अफली तरी अधेमधे येणारे हलकेफुलके फंवाद प्रेक्फकांचं चांगलं मनोरंजन करतात.

विफाल भारद्वाजच्या बर्‍यापैकी गाजलेल्या ओंकारानंतर कमीने हा चित्रपट तो एक परिपक्व दिग्दर्फक अफण्यावर फिक्कामोर्तब करतो. खरंतर जुळे भाऊ, गुंडगीरीची पार्फ्वभूमी, बॉलीवूड फ्टाईल कथा अफूनही कमीने आपलं वेगेळेपण राखून ठेवतो. दिग्दर्फकाचं खरं यफ कथेच्या हाताळणीत आहे कारण कथेचा विफय बघता चित्रपटात तोच-तोपणा येऊ फकला अफता किंवा कंटाळवाणा होऊ फकला अफता. पण उत्तम चित्रीकरण, फंकलन आणि कथेला दिलेल्या वेगामुळे अफे घडत नाही. आता अफं होईल अफं वाटत अफताना तफं घडतही नाही. काही जणांना फेवटी चित्रपट थोडा अतिरंजीत वाटू फकतो, पण तेव्हाही दिग्दर्फकाने एक-दोन हलके फुलके प्रसंग घालून तो अतिरंजीतपणा कमी करण्याचा प्रयत्न केलाय. चित्रपटात दाखवलेली मुंबई खुपच खरी वाटते. कुठेही विनाकारण फ्वच्छ फेट नाहीत. आपल्या आजूबाजूला जफे वातावरण अफेल तफेच आहे (नाहीतर करण जोहरच्या चित्रपटातला भिकारीफुद्धा डिझायनर कपडे घालून फंगमरवरी वाडग्यात भिक मागत अफतो). चित्रपटातलं 'ढँ ट ढॅण' हे गाणं फोडलं तर दुफरी कोणतीच गाणी माहीत नव्हती, तरीही चित्रपट बघताना काही फरक पडला नाही. गाणी मोजकीच आणि योग्य ठिकाणी अफल्याने चित्रपटात अडथळा वाटत नाहीत. एकंदरीत चित्रपट प्रभावी आणि बघण्यासारखा झालांय. फ्वाईन फ्लूचा धफका कमी झाला की हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन जरूर बघा.

मी चित्रपटाला चार चांदण्या देतो.
*****

अवांतरः चित्रपटाचा परिणाम म्हणून फंपुर्ण लेखात 'फ' हा 'फ' अफा टंकण्यात आलाय.

-(चित्रपट प्रेमी) अनामिक

Monday, June 1, 2009

कावळा आणि चिमणी

खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे.

कावळा आणि चिमणी
राहायचे शेजारी
सुख होतं भरपूर
दोघांच्याही घरी

कावळ्याचं घर होतं शेणाचं
चिमणीचं घर होतं मेणाचं

एकदा काय झालं
खूप पाऊस आला
पुराच्या पाण्याने
गाव भरून गेला

कावळ्याचं घर गेलं वाहून
चिमणीकडे आला तो धावून

"चिमणे चिमणे दार उघड"
कावळा म्हणाला चिमणीला
"पिलू आहे छोटं, वेळ नाही मला"
चिमणी म्हणाली कावळ्याला

कावळा बिचारा गेला निघून
पावसाच्या पाण्यात राहिला भिजून

चिमणी मात्र होती
तिच्या पिलात व्यस्तं
पिलासवे तिचा
दिवस जाई मस्तं

दिवसां मागे दिवस गेले
चिमणीचे पिलू मोठे झाले

पिलाला उडायची
हौस होती भारी
उंच आकाशात
त्याने मारली भरारी

मोकळ्या आकाशी गेले ते उडून
चिमणीच्या घरट्यात, नाही आले परतून

चिमणीला पिलाची
यायची आठवण
पिलू मात्र करी
पैशांची पाठवण

चिमणी झाली होती खूप म्हातारी
म्हातारपणाने पडली आजारी

"आजारी आहे चिमणी"
असा पिलाला निरोप गेला
पण ऐन वेळी मदतीला
कावळाच धावून आला

पिलू होते दूर
त्याने केला फोन
औषधांसाठी म्हणे
पाठवतो पैसे दोन

चिमणी म्हणे पिलाला, पैसे नको...
माझी थोडीही काळजी करू नको

कावळ्याने चिमणीची केली सेवा
खायला तिच्यासाठी आणला मेवा

कावळ्याच्या मदतीने
चिमणी झाली बरी
त्याची तिने मागितली
माफी खरी खरी

कावळा म्हणाला विचार नको करू फार
घरासोबत जोडावे मित्रही चार!

कावळा अन् चिमणी आता
झाले मित्र पक्के
एकमेकांच्या मदतीने
काढले आयुष्य अख्खे!

-अनामिक

Wednesday, May 27, 2009

आठवणींचा पाऊस

बाविसाव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसातून आज बाहेर बघताना खूप काळे ढग जमलेले दिसताहेत. तसं ऍटलांटामधलं वेदर फारच अनिश्चित असतं, आणि एवढ्यात तर ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळताहेत. पण आज न जाणो का खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनातही आठवणींचे ढग जमून आले... खूप नॉस्टॅल्जीक वाटायला लागलं आणि मन कधी भूतकाळात गेलं ते कळलंच नाही. (भारतातही आता पावसाचं लवकरच आगमन होईल. वादळी पावसाने तर विदर्भात आधीच आपली वर्दी लावली आहे.)

मे महिन्याचा शेवट झाला आणि जूनच्या सुरवातीला मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची चाहूल लागली की घरोघरी एकच प्रकार सुरू असतो .. छत्र्या माळ्यावरून खाली काढण्याचा. आमच्या कडेही काही अगदी वेगळं नव्हतं, जून सुरू झाला आणि शाळा सुरू होणार म्हंटलं की आम्हीही आमच्या छत्र्या बेडरूममधल्या सज्जावरून खाली काढायचो. बाहेर अंगणात नेऊन व्यवस्थित झटकून त्या व्यवस्थित आहे की नाही ते बघायचो. त्यात एक ना दोन छत्र्यांची एकतरी काडी तुटलेली असायची, किंवा बटणतरी बिघडलेलं असायचं, एखादीचं कापड मधेच कुठेतरी अडकून फाटलेलं असायचं, किंवा एखादी नीट बंद होत नसायची. हे सगळं मागच्या वर्षी पावसाळा संपतानाच झालेलं असायचं. पण आता कुठे पाऊस पडतोय, अन पडला तरी वापरू अशीच असं म्हणून तो पावसाळा त्या बिघडलेल्या छत्रीवरच काढला जायचा... पुढच्या वर्षी नवीन छत्री घेऊ असं ठरवून! पण येणार्‍या पावसाळ्याच्या सुरवातीला एक काडीच तर तुटली आहे असा युक्तिवाद करून छत्र्या दुरुस्तं करायला लागायच्या. तसेच शाळेच्या नव्या वर्षाच्या सुरवातीला होणार्‍या वह्या-पुस्तकांच्या खर्चात छत्रीची भर कशाला अशी मध्यमवर्गीय समजूत घरच्यांची असायची, जी अगदी रास्तं होती (पण तेव्हा नव्हतं पटत हे). आम्हा भावंडांच्या छत्र्याही ठरलेल्या होत्या... बटणवाल्या, छोट्या आकाराच्या. बाबांची मात्र जुन्या पद्धतीची, अगदी मोठी, दोघंजण सहज मावणारी अन खाली यू आकाराचा दांडा असलेली. मला आठवतंय, माझ्या छत्रीचा दांडा माझ्या हातून तुटला होता आणि बिनदांड्याची छत्री शाळेत न्यायला (कसली कोण जाणे) लाज वाटायची. केव्हढा हट्ट केला होता मी नव्या छत्री साठी! तेव्हा ताईने तिची छत्री मला दिली आणि शाळेतले पुढचे दोनेक वर्ष ती स्वतः तुटक्या दांड्याची छत्री घेऊन जायची (तेव्हा असलेल्या परिस्थितीत बाबांवर साध्या छत्रीच्या खर्चाचाही बोजा नको असं तिचं मत कळायला मला थोडं मोठं व्हायला लागलं). असो, छत्र्या दुरुस्त झाल्या आणि नीट उघडता आणि बंद करता आल्या की एक मोठ्ठं काम झाल्यात जमा असायचं, आणि आता वाट बघितली जायची ती येणार्‍या पावसाची!

पाऊसही यायचा, कधी अगदीच लवकर तर कधी बराच उशीरा. पण पहिला पाऊस पडला की काय मस्तं वाटायचं. अगदी लहान होतो तेव्हाचंही आठवतंय. आमचं घर मुख्य रस्त्यापासून बरंच आत आहे. आणि मी लहान असताना घरापर्यंत जायला डांबरी रस्ताही नव्हता. घराच्या पुढे (कॉलनीमधे) खूप मोकळी जागा होती. शिवाय सगळी वसाहत शेतजमिनीवर झाल्याने चिखलही भरपूर व्हायचा. मोठ्या लोकांची आपली कुरकूर सुरू असायची. पण आम्हाला मात्र मोकळं मैदान, त्यात पावसाचं साचणारं पाणी खूप आवडायचं. त्या साचलेल्या डबक्यात धप्पाक्कन् एक पाय देऊन किंवा उडी मारून मिळणारा आनंद शब्दात व्यक्तं कसा करता येईल? एकदा तर खूप पाऊस झाला, घराबाहेरच्या मोकळ्या मैदानात पाणी अगदी गुडघ्या पर्यंत साचलं. वाहतं पाणी होतं ते... मला दम कुठला, मी आणि माझा मित्र अगदी अनवाणी पायाने त्या पाण्यात कितीतरी वेळी भटकलो. शेवटी थकून घरी येताना कपड्यांकडे लक्षं गेलं... घरी गेल्यावर काय झालं ते सांगायलाच नको!

पावसात एक गोष्टं व्हायची, रस्त्यावर भरपूर चिखल झालेला असायचा अन शाळेच्या रस्त्यावर एका विशिष्ट ठिकाणी, शाळेत जाणार्‍या मुलामुलींपैकी कोणाची तरी चप्पल चिखलात घसरून तो/ती चिखलात पडलेला असायचा. माझ्यावर कधी ही पाळी आली नाही, पण पडलेल्या मुलामुलींवर हसण्याचं सुखं मात्र भरपूर घेतलंय. कितीतरी मुलामुलींना पावसाळी दिवसात रस्त्यावरून कसं चालावं तेच माहीत नसतं. चिखल बघून, घसरड्या जागा बघून चालणे वेगळे, आणि भर रस्त्यावर (पातळ) चिखलात चालणे वेगळे. कितीतरी मुलं चपला घालून ह्या चिखलात फताक फताक आवाज करत चालतात, त्यामुळे त्या मुलांचा पार्श्वभाग शिंतोड्यांनी मस्तं भरला जातो. हे टाळायचं असेल तर चिखलात चालताना टाचेवर भर देऊन चालावे, पाऊल पुढे टाकतानाही टाचेवर भर दिला तर पाठीवर असे शिंतोडे उडत नाहीत! मी लहान असताना पावसात अजून एक फायदा होता... शाळेच्या वेळेत जोरदार पाऊस आला की छपरावर होणार्‍या पावसाच्या कर्कश्श आवाजात मास्तरांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहचायचाच नाही. मग त्या तासाला न शिकवता काहीतरी वेगळंच केलं जायचं. तसेच, घरी परत येताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून लिक झालेल्या ऑइल/पेट्रोलमुळे साचलेल्या पाण्यात तयार होणार्‍या चमकत्या सप्तरंगात स्वतःला हरवून टाकावं वाटायचं!

पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या तयार करून न सोडलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. तो तर पावसाच्या दिवसातला छंदच असतो कित्येकांचा. पण ह्या दिवसात आम्ही कॉलनीतले मित्र अजून एक खेळ खेळायचो... "खुपसणी". आता नियम आठवत नाहीत, पण एका लोखंडी गजाचा तुकडा (म्हणजेच खुपसणी) एका विशिष्टं पद्धतीने पावसाने ओल्या झालेल्या जमिनीत खुपसेल असा फेकण्याचा काहीतरी प्रकार होता. कोणा एकावर राज्य असायचं आणि बाकीचे खुपसणी जमिनीत खुपसत पुढे जायचे. जिथे खुपसणी जमिनीत खुपसल्या गेली नाही तिथे तो मुलगा बाद व्हायचा. आणि सगळे बाद झालेल्या ठिकाणावरून राज्य असलेला मुलाला एका दमात लंगडत सुरवातीच्या ठिकाणी यायला लागायचं. मजा यायची पावसाने भिजलेल्या जमिनीत, आणि थंडगार वातावरणात खेळताना.

पावसामुळे अजून एक गोष्ट व्हायची... आमच्या घराच्या गच्चीच्या स्लॅबचा उतार नीट न काढल्याने गच्चीवरही जागोजाग पाणी साचायचं. हे पाणी स्लॅबमधे मुरून घरात आतल्या भागात ओल यायची. त्यामुळे पाऊस पडून थांबला की आम्ही भाऊ-बहीण गच्चीवर जाऊन पाणी पायाने बाहेर काढायचो. मी लहान असतानाचे दिवस म्हणजे दूरदर्शनचे दिवस. पाऊस पडून गेला की पावसामुळे म्हणा किंवा वार्‍यामुळे म्हणा एंटीना हालायचा आणि टीव्हीवर फक्तं मुंग्या दिसायच्या. आम्हा तिघांपैकी मग एकजण एंटीना हालवायचं काम करायचा, एकजण गच्चीच्या कडेला आणि तिसरा खाली खिडकीपाशी असायचा. मग थोडं उजवीकडे, थोडं डावीकडे असं ओरडत टीव्हीवरच्या मुंग्या कमी झाल्या की परत सगळे घरात. पावसाळ्यात हा प्रकार नेहमीचाच!

या दिवसात टीव्हीवर मुंग्या यायच्याच, पण सर्वत्र अन्य प्राण्यांची संख्याही वाढायची. ह्या अन्य-प्राण्यात पहिला नंबर लागतो तो बेडकांचा. चिखल आणि भरपूर साचलेलं पाणी असलं की बेडूकही भरपूर व्हायचे. एरवी न दिसणारा हा प्राणी पाऊस पडला की लगेच एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या ताबडतोब कसा हजर होतो हे मला न सुटलेलं कोडं आहे. तसेच दिवसभर न ओरडणारे बेडूक रात्र झाल्यावरच का डराव डराव करतात हे दुसरं कोडं! (आमच्या घरचा संडास दिवसरात्र बंद असूनही, दरवर्षी एकदातरी तिथे एक बेडूक जाऊन बसलेलाच असायचा. अशा संकटसमयी त्या बेडकाला लवकरात लवकर बाहेर काढताना त्रेधा उडायची). बेडकांमध्ये काही बेडकांची त्वचा अगदी चोपडी असायची आणि त्यांचा रंगही वेगवेगळा आणि आकर्षक असायचा, तेवढच काय ते बेडकांबद्दल नवल वाटण्यासारखं! पावसात दिसणारा दुसरा प्राणी म्हणजे गोगलगाय. ह्या गोगलयींचेही तीन प्रकार आहेत. एक -शंख पाठीवर असलेली, दोन - लाल रंगाची, खूप पाय असलेली आणि शेकडोंच्या घोळक्याने दिसणारी, आणि तिसरी म्हणजे शेंबडी गोगलगाय. ही गोगलगाय माझी सगळ्यात नावडती... चपटी, लिबलिबीत आणि जिथून चालत गेली त्या जागेवर शेंबडा ट्रेल (मराठी शब्द) सोडणारी! पावसाळी दिवसात गांडूळही बर्‍याच प्रमाणात दिसायचे. आणि क्वचित निघणारा प्राणी म्हणजे साप! पाऊस पडून गेल्यावर आणि सगळीकडे हिरवेगार झाल्यावर दिसणार्‍या फुलपाखरांना आणि काजव्यांना विसरून कसं चालेल. लहानपणीचे कितीतरी दिवस ह्या फुलपाखरांच्या मागे धावण्यात आणि पकडण्यात गेलेत.

फुलपाखरांमागे धावता धावता दिवसही कसे भुर्र्कन उडून गेले ते कळलंच नाही. पहिला पाऊस, मातीचा सुगंध, रिमझीम पावसात प्यायलेला वाफाळता चहा किंवा खाल्लेली गरम गरम भजी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवे हिरवे गार गालिचे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. पण एखादा दिवस असा येतो की बाहेर जमलेल्या काळ्या ढगांसारखं, मनातही आभाळ दाटून येतं आणि आठवणींचा पाऊस डोळ्यातून बरसू लागतो.

-अनामिक

Tuesday, January 13, 2009

समजूत

प्राजु ताईने आपल्या "माझं काय चुकलं... " या कवितेतून एका छोटीचे आपल्या आजीपाशी मांडलेले मनोगत व्यक्त केले आहे. कविता सुंदरच आहे! (कविता वाचण्यासाठी इथे टिचकी मारा). लहान असताना कदाचित प्रत्येकानेच आपल्या आईचा धपाटा खाल्ला असेल. त्या वयात तो धपाटा आपण का खाल्ला हे आपल्याला कळतही नसते, आणि म्हणूनच की काय ति छोटी आपल्या आजीला विचारते "माझं काय चुकलं..?" छोटीच्या ह्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून मला उत्स्फुर्तपणे सुचलेली आजीची प्रतिक्रिया किंवा आजीने छोटीची काढलेली समजूत खालच्या कवितेत (बडबड गीतात?) देत आहे.

*************************************
राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती
हसू येते मला, पाहून तुझ्या करामती

ललू नको बघ तुझे नाक झाले लाल
हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल

हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ
संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ

फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल
बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल

माललं त मालू दे, आई आहेच वेडी
हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी

*************************************

-अनामिक

Monday, January 12, 2009

विजेची बचत

गेल्या विकांताला इंटरनेटवर गायनाच्या रियालिटी शोचा फिनाले बघत होतो. शो छान वाटला, बघायला मजा आली. पण बघता बघता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ति म्हणजे त्या किंवा तत्सम कार्यक्रमात स्टेजवर केलेला 'झगमगाट'. प्रत्येक शो साठी वेगवेगळा स्टेज तयार करण्यात येतो आणि त्यावर गरज नसतानाही हजारो दिवे लावून स्टेज सजवले जाते. एकीकडे जिथे लोड शेडिंगमुळे सामान्य माणसाच्या घरात ८ ते १० तास वीज नसते (खेडे विभागात १२-१६ तास) तिथे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी गरजेपेक्षा जास्त वीज वापरणे किती योग्य? यावर आपल्या सरकारचे काही नियम/ काही बंधनं असायला नकोत का? बरं टी. व्ही चॅनल्सची संख्या दिवसागणिक वाढतच जातेय. आणि प्रत्येक चॅनलवर शेकडो शो... तेवढेच स्टेज... आणि तेवढाच झगमगाट/ विजेचा अपव्यय! याला कुठेतरी मर्यादा असायला हवी असे वाटते.

मागे एकदा अमिताभचा वर्ल्ड टूर (इंटरनेटवर) बघत असताना, साहेब/त्यांची पत्नी जयाबाई ग्लोबल वॉर्मिंगवर भाष्य करत होते (असंच काहीसं अक्षय कुमारपण करतो म्हणे अवॉर्ड शोज मध्ये). लोक म्हणत असतील बापरे, हा माणूस सांगतोय तर खरंच विजेची बचत करायलाच पाहिजे. कुठेतरी त्यांना विजेच्या बचतीची जाणीव होतही असेल. लोक त्यांच्या भाष्याने प्रेरित झाले तर आनंदच आहे, पण मलातरी अमिताभचं ते भाष्य म्हणजे 'लोका सांगे.... " वाटलं. दुसऱ्याला उपदेश देणाऱ्या अमिताभला विचारावंस वाटलं की "बाबारे दुसऱ्याला तू अगदी कळवळीने पटवून देतोयेस वीज बचती बद्दल, ते ठीकच. पण तुझ्या शो साठी या स्टेजवर जे हजारे-लाखो दिवे लावल्येत त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?" दुसऱ्याला सांगणे किती सोपे असते नाही?

असाच दुसरा एक प्रकार म्हणजे भारतात वाढत चाललेली मॉल संस्कृती. मॉलमध्येच नव्हे तर कोणत्याही शो-रुम मध्ये गेलात तर शेकडो दिवे आपलं स्वागत करतात. आता माल विकण्यासाठी खरंच ह्या शेकडो दिव्यांची गरज असते का असं विचारलं तर "नाही" असच उत्तर येईल. भर दिवसा सुद्धा दुकानात एवढे दिवे लावून विजेचा अपव्यय करण्याला काय म्हणावे? अशा सार्वजनिक ठिकाणी विजेचा अपव्यय टाळला तर घरोघरी होणारं लोड शेडिंग थोडं तरी कमी होईल असे वाटते.

सार्वजनिक ठिकाणं सोडली तर वैयक्तिक पातळीवर विजेची बचत करायचा किती जण प्रयत्न करतात? खरे पाहता आपल्यात अजून पुरेशी जाणीवच (अवेअरनेस) नाही आहे विजेची बचत करण्यासाठी. लोड शेडिंग कमी करण्यासाठी सरकार काहीच करत नाही असे म्हणून, सरकारला दोष देऊन आपण मोकळे होतो. पण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्यास असमर्थ ठरतो. जर प्रत्येकाने निश्चय केला तर साध्या साध्या गोष्टीतून विजेचा अपव्यय टाळता येतो. जसे...

१. आपण ज्या खोली मध्ये आहोत ति सोडून बाकीच्या खोलीतले दिवे/पंखे बंद असण्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास फ्लुरोसंट दिवे वापरावे.
२. ऑफिसमधून घरी जाताना किंवा घरातून ऑफिसात जाताना संगणक बंद करावा.
३. दोन तीन दिवसांपेक्षा जास्त घराबाहेर राहणार असाल तर मायक्रोवेव्ह, टिवी, संगणक, (फ्रीज चालू ठेवावा) आणि इतर मशीन्स बंद करून 'अनप्लग' कराव्यात. ह्या मशीन्स स्टँड बाय वर असल्याने देखील वीज खर्च करतात.
४. ए. सी. वापरताना सर्व दरवाजे, खिडक्या बंद आहेत की नाही हे व्यवस्थित तपासून घ्यावे. शक्यतो पंख्याचाच जास्त उपयोग करावा.
५. घरात वॉशिंग मशीन असेल तर तिचा उपयोग योग्य प्रमाणात कपडे गोळा झाल्यावरच करावा.
६. मुख्य म्हणजे दिवसा सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग करावा. खिडक्या उघड्या ठेवल्या तर घरात प्रकाश येतोच, आणि हवा खेळती राहते (ज्यांचे घर जादा वाहतुकीच्या ठिकाणी आहे त्यांनी स्वतःला हवे तसे उपाय अमलात आणावेत). उगाच गरज नसताना दिवे/पंखे वापरू नये.


अशा छोट्या छोटया गोष्टीतूनसुद्धा बऱ्याच प्रमाणात वीज वाचवता येते. मी जे काय म्हणतोय त्याच्याशी तुम्ही सहमत असालच आणि आपापल्या परीने विजेची बचत करतही असाल. शेवटी आपल्यापासून सुरवात केली तर लोक सुद्धा हळू हळू प्रेरित होतील. मी माझ्यापुरतं केलंय म्हणून चालणार नाही आहे, कारण वर म्हटल्याप्रमाणे हा प्रश्न फक्त वैयक्तिक पातळीवरचा नाहीये. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होतोय, आणि आपण ह्या विजेच्या अपव्ययावर आळा घालण्यासाठी काहीच करत नाही आहोत याची खंत वाटते.

अनामिक

(कदाचित हा चावून चोथा झालेला विषय असेलही, पण प्रत्येकाला विजेच्या बचतीची जाणीव व्हावी म्हणून अजून एक प्रयत्न समजा)

Wednesday, January 7, 2009

लाखचं घर

लाखचं घर म्हणजे लाख रुपयांच घर नाही... लाख हे माझ्या आजोबांच्या (आबांच्या) गावाचं नाव. 'लाख' - यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातलं, दिग्रसपासून जवळ-जवळ १५-२० किमी अंतरावर असलेलं एक खेडेगाव. आबा मी लहान असतानाच वारल्याने या घराशी माझा जास्त संबंध आलाच नाही, त्यामुळे खूप आठवणी आहेत असं म्हणू शकत नाही. पण तरीही या घराचं माझ्याशी असलेलं नातं वेगळंच आहे... कुठंतरी खोल खोल रुजलेलं! माझे काका दिग्रसला राहतात त्यामुळे आम्ही सगळे (भावंडं) सुट्या लागल्या की काकाच्या घरीच जास्त राहायचो. आणि मग एखाद्या दिवशी काका आपल्या गाडीतून लाखच्या घरी घेऊन जायचे; किंवा मग बाबा/काका आम्ही सगळे लाखला येणार आहोत असा निरोप पाठवायचे. तसंही त्या दिवसात, आणि तेही आपल्याच आजीच्या (मायच्या) घरी जायला निरोप पाठवायची गरज नसायची. पण सुरवातीच्या काळात महामंडळाची बस अगदी गावापर्यंत जात नसे. मग आम्ही बसने जाणार असलो की आधीच निरोप पाठवायला लागायचा, जेणेकरून कोणीतरी गडीमाणूस (सहसा बाबुलाल दादा किंवा श्रावण दादा) बैलगाडी घेऊन फाट्यावर यायचा.

फाट्यापासून लाख जवळ जवळ २-३ किमी अंतरावर असेल. आम्ही फाट्यावर उतरताच बाबुलाल दादा "काय मंग बालू (बाला/बालू/बाल्या हे माझं टोपण नाव) कवा आले दिग्रसले?" अशी विचारपूस करतच आपलं सामान स्वतःच्या हातात घेऊन बैलगाडीत ठेवत असे. आम्ही सगळे बैलगाडीत बसलो की मग रमत गमत, दोन्ही बाजूला पसरलेल्या शेतातून नजर फिरवत घराकडे जात असू. कधी कधी बाबुलाल दादा त्याच्या बरोबर बैलगाडी चालवायला द्यायचा (म्हणजे हातात फक्त दोर पकडायला द्यायचा). त्या खडकाळ रस्त्यावर बैलगाडी चालताना खूप धूळ उडायची, पण त्यावेळी त्यातही गंमत वाटायची. गावात शिरतानाच उजव्या बाजूला पाण्याच्या मोठ्ठा हौद होता (त्या हौदा शेजारी २-३ गायी-म्हशी-शेळ्या-कुत्री नेहमीच असत) आणि शिरल्या शिरल्या समोरच मारुतीचा पार. पारासभोवताली भरपूर मोकळी जागा. ह्या मारुतीच्या पारामागच्या वळणदार रस्त्यावरून वाळतानाच उजव्या हाताला आमच्या गायी बैलांचा गोठा लागतो, आणि पुढं १०-१२ पावलं गेलं की डाव्या हाताला आबा आणि मायचं घर.

लाखच्या घराची रुंदीच तीस एक फूट असेल. समोरच घराच्या रुंदी एवढा ओटा आणि त्या वर कौलारू छत. ओट्याच्या बरोबर मध्ये मोजून तीन पायऱ्या आणि ओट्यावर चढताच घरात शिरायला मजबूत लाकडी (अगदी जुन्या स्टाइलचं) दार. दाराच्या दोन्ही बाजूला दोन-दोन खिडक्या. आत शिरताच बैठकीची खोली. अगदी लांबलचक ओट्याच्या लांबीची. बैठकीत दोन लोखंडी पलंग, २-४ लोखंडी खुर्च्या मांडलेल्या. बाजूला लाकडी स्टूलवर टेबल फॅन. भिंतीवर दोन-तीन देवांच्या फोटोफ्रेम टांगलेल्या. भिंतीवरच्या खुंटीवरसुद्धा नेहमीच काहीतरी टांगलेलं असायचं. फक्त बैठकीच्या खोलीतच शहाबादी फरशी बसवलेली. बाकी सगळं घर शेणानं सरवलेलं असायचं. उरलेल्या घराच्या भिंतीसुद्धा विटा-मातीच्याच!

बैठकीच्या मागे लगेच मोठ्ठं अंगण. अंगणाच्या उजव्या हाताला न्हाणीघर आणि वापरायच्या पाण्याचा हौद. हौदाला लागूनच अंगण संपेपर्यंत मोठी भिंत आणि भिंती समोर चिकू, जास्वंद, कणेरीची झाडं आणि त्या समोर तुळशी वृंदावन! अंगणाच्या डाव्या हाताला अंगण संपेपर्यंत तीन खोल्या, आणि अंगण संपलं की समोरच परत एक लांबलचक खोली. ह्या सगळ्या खोल्या समोर टिनाचं शेड होतं. डाव्या बाजूच्या शेड खाली बरचसं शेतीच सामान आणि त्या समोर स्वस्तिक आणि गोडलिंबाची झाडं. आंगणासमोरच्या शेड खाली लाकडी सोपा ठेवलेला. सोप्यावर गाद्या नसल्या तरी त्यावर दुपारच्या वेळी झोपायला छान वाटायचं. डाव्या बाजूच्या पहिल्या खोलीत सगळं अडगळीचं सामान ठेवलेलं होतं तर दुसऱ्या खोलीत लाकडी कपाटं, संदुका आणि अवांतर सामान-सुमान होतं. आमचं सामान आम्ही याच खोलीत ठेवत असू. सगळं घर सारवलेलं असल्याने अंघोळ झाली की ओल्या तळपायाला माती लागून पाय खराब होतील म्हणून मला कुणालातरी (बहुदा आईच) त्या खोलीत उचलून न्यावं लागायचं. आता हे सगळं आठवलं की हसायला येतं! या खोल्यांमध्ये खिडक्या अश्या नव्हत्याच. होते ते वरच्या बाजूला असलेले झरोके. ह्या झरोक्यातून खोलीत तिरप्या दिशेने ऊन पडत असे आणि त्या उन्हात तरंगणारे धुळीचे कण पाहताना मी स्वतःतच हरवून जात असे.

आंगणातल्या समोरच्या कोपऱ्यातल्या तिसऱ्या खोलीत मायचं स्वयंपाक घर होतं, त्यात चुलं आणि गोबर गॅस वर चालणारी शेगडी होती. स्वयंपाक घराबाहेर एक जाळीची लोखंडी अलमारी होती, त्यात माय दुध, दही, लोणी, तुप ठेवायची. घरचं भरपूर दुध-दुभतं होतं त्यामुळे लाखला गेलं की मजाच मजा असायची. गायीच्या दुधावर चढणारी जाड पिवळसर साय आणि साखर म्हणजे 'जन्नत' वाटायची. चुलीवर भाजलेली भाकरी (आणि त्यावर घरचं साजुक तूप) चुलीशेजारी बसून खायची मजा काही औरच! एकंदर लाखला गेलं की माय आग्रह करून करून दुध-लोणी-तुप खायला घालायची.

घरी असलो की आमचा जास्तीत जास्त वेळ आतल्या अंगणातच जायचा . शेणानं गुळगुळीत सारवलेल्या अंगणात सकाळी सकाळी सडा टाकून झाला की माय छान रांगोळी काढायची. मायजवळ रांगोळीचे छापेपण होते. ते आमच्या हातात पडले की आम्ही आंगणभर छाप्याने रांगोळ काढत असू. माय रागवायची, म्हणायची "एकाच दिवसात रांगोळ संपवता का रे? " पण आम्ही ऐकत नसू. घरी असलो की आम्ही खेळून खेळून अंगण खराब करायचो. माय रागवायची अंगण खराब केलं म्हणून, पण चुपचाप बसलं की म्हणायची "जारे खेळा आंगणात", मग सगळे परत आंगणात. घरापेक्षा आंगणातच जास्तं वेळ जायचा. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री याच अंगणात एका रांगेत बाज (खाट) घालून सगळे जण झोपायचो. गार हवेची झुळुक आणि आकाशातले तारे मोजत कधी झोप लागायची ते कळायचंच नाही. जाग यायची तिच पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटाने. थंडीच्या दिवसात आम्ही लाखला गेलो तर बैठकीच्या खोलीत झोपत असु. सकाळी उठलो की खिडकीत बसून बाहेरच्या रस्त्यावरून अभंग गात काकड आरती साठी मारुतीच्या पारावर जाणारे लोक बघायला मजा यायची. त्यांचे ते कानावर पडलेले सुर मन प्रसन्न करायचे.

विदर्भातली शेती मुख्यत्वे कोरडवाहूच. शेतातल्या विहिरीला भरपूर पाणी असले तर ऊसाची लागवड करता येते, पण प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच शेती करायला लागते. आबांची शेतीसुद्धा (१-२ शेतं सोडलेतर) कोरडवाहूच. त्यामुळे कापूस, तुर, हरभरा, ज्वारी, गहू हेच धान्य शेतात पिकत असे. आबांचा संत्र्याचा मळादेखील होता. भरपूर आंबेपण पिकायचे शेतात. सगळे गावरान आंबे. त्यांची नावेपण तशीच - खोबऱ्या, भद्या, साखरघोटी (त्यांच्या प्रकारावरून पडलेली) अश्या प्रकारची. आम्ही हेच आंबे खाऊन मोठे झालो, त्यामुळे हापूस आंब्यांच कौतुक आम्हाला कधीच नव्हतं (भुवया उंचावू नका)! शेतातून फिरायला पण मजा यायची. चालून चालून थकलो की बाबुलाल दादा खांद्यावर घ्यायचा. परत येताना गावाच्या बाजूलाच असलेल्या ओढ्यातून खूप सारे रंगीत दगड गोळा करून आणायचो. दोन-चार दिवस कसे जायचे ते कळायचं देखील नाही!

आबा गेल्यानंतर माय काही वर्ष एकटी तिथे राहिल्याने (आणि आम्ही त्यावेळी लहान असल्याने) लाखच्या घराचा एवढा सहवास नशिबी तरी आला. पुढे मायची तब्येत ठीक राहत नसल्याने किंवा एकटी कशाला राहा अशा विचाराने ति आमच्या बरोबर राहायला आली. घरात घरातली कर्ती बाईच नाही म्हटल्यावर घराची आबाळ होणारच; लाखच्या घराचंही तसंच झालं. आम्ही (भावंडं) मोठे होत होतो, शिकायला घराबाहेर पडत होतो त्यामुळे लाखला जायला नाही मिळायचं. मागे एकदा जाणं झालं तेव्हा मायला पण घेऊन गेलो होतो. घराचा रंग उडलेला होता. घरातल्या खोल्यांतली जमीन उंदरांनी उकरलेली. सगळी झाडं वाळलेली. सगळं कसं मोडकळीस आल्या सारखं वाटलं (कोणी तिथे राहतच नसल्याने बैठकीची खोली सोडली तर बाकी घराची साफसफाई झालीच नव्हती). घराकडे बघून माय गाडीतून उतरली पण नाही. एवढंच म्हणाली "काय बघायचं रे, माझ्या सारखंच झालंय घरं, जुनं अन मरायला टेकलेलं! " ति जे बोलली ते जरी खरं असलं तरी, आपल्या आयुष्यातली प्रिय व्यक्ती जशी आपल्या मनातून कधीच जात नाहीत, तसंच लाखंच घर माझ्या मनातून कधीच जाणार नाही!